'बेस्ट' मंडळाने उत्पन्नवाढीचे कारण देत केलेल्या भाडेवाढीमुळे दररोजची प्रवासीसंख्या सरासरी 22 लाखांपर्यंत पोहोचली आहे. 8 मे रोजी हीच प्रवासीसंख्या 25 लाख होती.
एरवी 'बेस्ट'ची (best) प्रवासीसंख्या 31 ते 32 लाख असते. एप्रिल ते जून हा सुट्टीचा काळ असल्याने अनेक जण मुंबईबाहेरही (mumbai) फिरण्यासाठी जात असल्याने प्रवासीसंख्या (passangers) घटते, असे सांगितले जात आहे.
मात्र कमी होणाऱ्या बसगाड्या आणि भाडेवाढीमुळे प्रवासीसंख्या पुन्हा 'जैसे थे' होणेही कठीण असल्याची भीती बेस्ट उपक्रमाकडून व्यक्त केली जात आहे. तरीही भाडेवाढीमुळे दररोजच्या उत्पन्नात 85 लाख ते एक कोटी रुपयांची भर पडत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बेस्ट उपक्रमाला होणाऱ्या आर्थिक तोट्याच्या पार्श्वभूमीवर 9 मेपासून भाडेवाढ करण्यात आली. सध्या बस प्रवासासाठी पाच किमी अंतरापर्यंतचे किमान प्रवासभाडे 5 रुपयांवरून 10 रुपये, तर वातानुकूलित बसप्रवासासाठी 5 किमी अंतरापर्यंतचे प्रवासभाडे 6 रुपयांवरून 12 रुपये झाले आहे. पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
सध्या शाळा, महाविद्यालयांना असलेल्या उन्हाळी सुट्टीमुळे अनेक जण कुटुंबासह बाहेरगावी जातात. त्यामुळे या काळात प्रवासी आणि उत्पन्न कमीच असते. मात्र भाडेवाढीनंतर या संख्येत आणखी घट (decrease) झाली आहे. घटलेल्या प्रवासीसंख्येसाठी भाडेवाढीसह बेस्ट बसगाड्यांची कमी झालेली संख्याही कारणीभूत आहे.
अनेक प्रवासी बसची वाट पाहून कंटाळून पुढील प्रवासासाठी रिक्षा, टॅक्सीचा आधारही घेत आहेत. बसगाड्या कमी झाल्याने बसफेऱ्याही कमी होत आहेत.
हेही वाचा